Uncategorized

1 मे, कामगार दिन चिरायू होवो! जगातील कामगारांनो एक व्हा !

1 मे, कामगार दिन चिरायू होवो! जगातील कामगारांनो एक व्हा!

कामगार संघर्षातून प्रेरणा घ्या, नवे लढे उभे करा!

सर्व कामगार, कष्टकरी साथींनो,

जगभरात ज्या काही घटनांनी मानवी समाजमनावर एक अमीट छाप सोडली आहे, कामगार-कष्टकऱ्यांच्या जगण्यात आमूलाग्र परिवर्तने घडवून आणली आहेत, त्यापैकी एक घटना म्हणजे 1 मे चा शिकागो कामगारांचा लढा. याच दिवशी कामगार वर्गाच्या नायकांनी प्राणाहुती दिली, व कामाचे तास आठ यासह इतर श्रम-कायदे प्राप्त करून घेणाऱ्या आंदोलनांचा पाया घातला. 1 मे म्हणजे ‘मे दिवस’ कामगारांच्या याच झुंजार लढ्याला आणि बलिदानाला आठवण्याचा, त्यातून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. आज जेव्हा प्रत्येक क्षेत्रात 10-12 तास काम आणि दोन वेळ खायलाही पुरणार नाही इतका कमी पगार या स्थितीत कामगार कष्टकऱ्यांची पिळवणूक चालली आहे, कॉंग्रेस सरकार असो वा फासीवादी मोदी सरकार कामगार कायद्यांना मोडीत काढत आहेत व धनदांडग्या भांडवलदारांना चरायला कुरण मोकळे सोडणारे कायदे करत आहेत, अशा वेळी या लढ्यांची आठवण काढणे आणि त्यापासून प्रेरणा घेत कामगार कष्टकऱ्यांचे नवे लढे उभे करणे हे आपले कर्तव्य आहे.

आज पासून तब्बल 133 वर्षांपूर्वी अमेरिकेतील शिकागो मधील कामगारांनी माणसासारखं जगता याव म्हणून संघर्षाला सुरुवात केली. त्यावेळी दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत 18/20 तास गुराढोरांसारखं कारखान्यात राबावं लागत असे. असुरक्षित, अनिश्चित, अमानवीय स्थितीत पिचणारा कामगार त्या यंत्राचा जणू वाढवलेला भाग होता. या दयनीय अवस्थेविरोधात कुणी ब्र जरी काढला तरी मालक, त्यांचे गुंड वा पोलीस धाडून हल्ले करत असत. अशा वेळी शिकागोच्या धाडसी कामगारांनी जनावरांसारखं राबायला नकार देत, 1 मे 1886 रोजी ‘आठ तास काम, आठ तास आराम, आठ तास मनोरंजन’ ही घोषणा दिली आणि शिकागोसह संपूर्ण अमेरिकेतले कामगार रस्त्यावर आले. भ्याड मालकांनी कामगारांच्या एका सभेवर भाडोत्री गुंडा करवी हल्ला केला, ज्यात 6 कामगारांची हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यावर पोलिसांकडून हल्ला करून मालकांनीच बॉंब फेकला ज्यात काही पोलीस व कामगारांचा मृत्यू झाला. बॉम्ब फेकण्याच्या खोट्या आरोपाखाली आठ कामगार नेत्यांवर खटला चालवण्यात आला व चार कामगार नेते, अल्बर्ट पार्सन, ऑगस्ट स्पाईस, एन्जेल्स व फिशर यांना फाशी देण्यात आली. आपल्या प्रिय नेत्यांच्या अंत्ययात्रेत जवळ जवळ 6 लाख कामगार सामील झाले होते. शिकागोतल्या या ठिणगीने जगभरातील कामगारांना चेतवले व आठ तासाच्या कामाची मागणी जगभरातील कामगारांची मागणी बनली. अखेरीस कामगारांनी त्यांच्या संघर्षाच्या आणि बलिदानाच्या जोरावर ही मागणी कमावली आणि आठ तासाचा कामाचा दिवस करायला जगभरातील भांडवलदारांना भाग पाडले.

आपले हक्क मिळविण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संघर्ष केला आहे व करत आहेत. त्याला कधी यश आले तर कधी अपयश आले पण कामगार अविरत संघर्ष करत राहिला. आज सुद्धा करतोय. का करतोय कामगार संघर्ष? उत्तर सोपं आहे. सुई पासून जहाजापर्यंत सर्व वस्तू कामगारच बनवतो. तो रस्ते बनवतो, मोठ मोठे महाल बनवतो, विमान, ट्रेन बनवतो. . भगतसिंहाच्या शब्दात सांगायचे झाले तर समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्याच्या प्राथमिक हक्कापासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकराला आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्याइतके देखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात. याउलट समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्यामोठ्या लहरींखातर लाखो-कोट्यावधींची उधळपट्टी करतात. आजही भगत सिंहाचे हे शब्द प्रासंगिक आहेत. कामगार वरवर स्वतंत्र वाटतो पण प्रत्यक्षात मात्र तो भांडवलदारांचा, मोलमजुरीचा गुलामच असतो आणि बकाल झोपडपट्ट्यांमध्ये राहण्यास मजबूर आहे.

लढून मिळवलेले श्रम-कायदे आज कायद्याच्या पुस्तकात सडत आहेत. त्यात पुन्हा जगभरातली सरकारं उरले-सुरलेले अधिकारही हिरावून घेत आहेत. आज भारतातील 93 टक्के श्रमिक ठेक्याने, रोजंदारीवर व पीस रेटवर 12/14 तास काम करताहेत, म्हणजे या श्रम कायद्यांना काहीच अर्थ राहत नाही. जे काही थोडे कायदे शिल्लक राहिलेत, त्यांनाही कॉंग्रेस/भाजप सारखी भांडवली सरकारं संपवू पाहत आहे. महाराष्ट्रात 41,000 कारखाने आहेत पैकी 39,000 कारखान्यांमध्ये 300 हून कमी कामगार काम करतात. केंद्रातील मोदी सरकारने एक मसुदा अधिसुचना जाहीर केली आहे ज्याद्वारे उद्योगांमध्ये ‘फिक्स्ड टर्म नियुक्ती’ करायला मंजूरी मिळेल आणि ज्या कारखान्यात कामगारांची संख्या 300 पर्यंत असेल, त्याला मालक कधीही बंद करू शकेल, म्हणजे 300 कामगारांना मालक जेव्हा वाटेल तेव्हा लाथ मारून कामावरून काढू शकतो. एका बाजूला कारखाने, खाणी, बांधकाम इ. क्षेत्रात कामगारांना नरकासम जगायला भाग पाडले जात आहे, तर दुसरीकडे कारखान्याच्या बाहेर, चौकांमध्ये कोट्यवधी बेरोजगारांची फौज उभी आहे. भांडवलशाहीत मनमानी वेतन देण्याचं व कामगार कपात करण्याच स्वातंत्र्य मालकवर्गाला हीच बेरोजगारांची फौज प्रदान करते. आज देशामध्ये जवळपास 30 कोटी युवक बेरोजगार आहेत. 2018 मध्ये रेल्वेच्या 90,000 जागेसाठी 2.8 कोटी अर्ज आले आहेत हा आकडा भारतातल्या बेरोजगारांच्या फौजेचं भयावह वास्तव स्पष्ट करायला पुरेसा आहे. एकीकडे कामगार कारखान्यात अल्प मजुरीवर प्रचंड राबताहेत, आणि दुसरीकडे कोट्यवधी युवक रोजगारासाठी दारोदार भटकत आहेत!

तिकडे देशातल्या वरच्या 1 टक्के लोकांकडे मात्र देशाच्या एकूण संपत्तीचा 58.4 टक्के हिस्सा केंद्रित झालाय तर वरच्या 10 टक्के लोकसंख्येकडे हा आकडा 80.7% टक्के पर्यंत पोहचलाय. देशातील जवळजवळ 80 कोटी पेक्षा जास्त औद्योगिक व शेतात काम करणारे कामगार तसेच गरीब शेतकरी दिवस-रात्र काबाडकष्ट करून देखील भुकेशी आणि कंगालीशी झगडत आहेत. देशात 59 कोटी कामगार ठेकेदारी पद्धतीवर राबत आहेत. जरी नियम आठ तास काम करण्याचा असला तरी देखील आजही अनेक कामगारांकडून 12-14 तास काम करून घेतले जातेय. आज देशातील सफाई कामगारांची हलत बघितल्यावर अंगावर काटा येतो. ठेकेदारी पद्धतीने काम आणि सफाईसाठी कामगारांना लागणारे साहित्य उदा.मास्क, हात मोजे, गम बूट इ.सुरक्षा साहित्य सुद्धा पुरविले जात नाही. सफाईकाम करणाऱ्या कामगारांमध्ये वर्षाला 350 कामगार मृत्यूमुखी पडतात. नफ्या तोट्याच्या बाजारात कामगारांच्या जीवनाला काडीची देखील किंमत नसते.

अशा वेळी मे दिवसाच्या कामगार आंदोलनातील शहीद नेता स्पाईस याच्या शब्दानां पुन्हा आठवण्याची गरज आहे, जेव्हा तो मृत्यूची शिक्षा ठोठावली जात असताना ओरडून म्हणाला होता, “तुम्हाला वाटत असेल कि आम्हाला फासावर लटकावून तुम्ही कामगार आंदोलनाला, गरीबी आणि दुरावस्थेत कणा तुटेपर्यत कष्ट करणाऱ्यांचे हे आंदोलन चिरडून टाकाल, जर हीच तुमची इच्छा असेल तर खुशाल आम्हाला फाशी द्या. पण लक्षात ठेवा, आज तुम्ही एका ठिणगीला चिरडत आहात, पण पुढे तुमच्या आजूबाजूला, मागे, पुढे, सगळीकडे ज्वाळा भडकू लागतील. ही जंगलाची आग आहे. तुम्ही कधीच ती विझवू शकणार नाही.” आज शहीद कामगारांच्या संघर्षातून प्रेरणा घेवूनच या शतकाच्या कामगार आंदोलनाची नवी सुरुवात करावी लागेल. हे सांगण्यासाठी की कामगार यंत्राचा एक भाग नाही. यंत्रे माणसाच्या सुविधेसाठी आहेत त्यांना गुलाम बनवण्यासाठी आणि भांडवलदारांच्या नफ्यासाठी नाहीत आणि हे सांगण्यासाठी सुद्धा की अजून आम्ही हरलो नाहीत, आपल्याला एकजूट होत संघर्ष करावा लागेल.

हे लक्षात घेतले पाहिजे की भांडवली व्यवस्थेत कोणतेही सरकार आले तरी कामगार वर्गाचे भले काही होणार नाही. कारण निवडणुका भांडवलदारांच्या पैशावर लढवल्या जातात आणि भांडवलदारच कामगारांचे शोषण करत असतो.आज जगभरात सगळीकडेच आर्थिक हालत खराब असल्यामुळे कट्टर उजव्या फासीवादी विचारांच्या शक्ती सत्तेत येत आहेत. आपल्या देशात सुद्धा तीच गत आहे. म्हणून आपल्यासारख्या गरीब, कष्टकरी-कामगार जनतेला भांडवलधारी सत्ताधाऱ्यांचे कांगावे ओळखावे लागतील. आपल्याला जात-पात, धर्माच्या, नकली देशभक्तीच्या नावाखाली लढवत ठेवून स्वतःची पोळी भजण्याचे त्यांचे काम सुरु आहे. मूठभर इंग्रजांनी सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्या देशावर राज्य केलं. आता मूठभर भांडवलदार त्याच पद्धतीनं आपल्यावर राज्य करीत आहेत. त्यासाठी आपण सगळे भेदभाव सोडून वर्ग एकजुटीने ‘मे दिना’ची प्रेरणा घेऊन एका सुंदर जगाचं स्वप्न बघूयात जिथे माणूस माणसाचे शोषण करणार नाही, राष्ट्र राष्ट्राचे शोषण करणार नाही. असा समाज घडविण्यासाठी संकल्प करून कामाला लागुयात. जगातील कामगारांनो तुमच्याजवळ तुमच्या हातापायातील शृंखलांखेरीज गमाविण्यासारखे काहीसुद्धा नाही. जिंकायला तर सारं जगच तुमचे आहे.

आज दिवस उद्घोषाचा                                  आहोत आम्हीही माणुस

हवी आम्हाला दुनिया चांगली                         करतो ऐलान

घृणीत गुलामी कोण्या रुपात               नाही आम्हा स्वीकार

मुक्ती आमचे अमीट स्वप्न                 मुक्ती आमचे गान

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI)

केंद्रिय पत्ता : बी-100, मुकुन्द विहार, करावलनगर, दिल्ली-110094

संपर्क मुंबई: द्वारे बबन, १०४, हीरानंदानी बिल्डींग 7-बी, लल्लुभाई कम्पाउंड, मानखुर्द(वेस्ट) मुंबई फोन: 9145332849, 9619039793

संपर्क अहमदनगर: द्वारे संदीप सकट, सोमनाथ केंजळे; दीपनगर, केडगाव, अहमदनगर – 414005 फोन: 8788858952, 7058197729

संपर्क पुणे: 8669735643, 7798364729        ईमेल: contact.rwpi@gmail.com  व्‍हाट्सअॅप: 8788858952  वेबसाइट:rwpi.org फेसबुक: fb.com/revolutionaryworkerspartyofindia  टि्वटर: twitter.com/rwpiorg इंस्‍टाग्राम: instagram.com/rwpindia

 

हे पत्रक बबन ठोके यांनी RWPI करिता मुंबई येथे 1 मे 2019 रोजी प्रकाशित केले.